सध्या सांगली मिरज
आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असून सध्या सर्व
भागांमध्ये सर्व पक्षातील उमेदवारांनी आपल्या प्रचाराची घोडदौड सुरु केली आहे. तसे
पाहता सध्याचे युग हे हायटेक म्हणजेच तंत्रज्ञानाचे युग समजतो. निवडणूक प्रचारासाठी सोशल मिडिया, टेलिव्हिजनस् यासारख्या नवनविन संकल्पना एकीकडे राबवत असतानाच दुसरीकडे
पारंपारिक विचारांनी युक्त असलेल्या विचित्र घटना या वेळी पाहावयास मिळत आहेत.
दोनच दिवसामध्ये मिरज शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी टांगलेल्या एका
काळया बाहूलीने लोकांचे लक्ष वेधून घेतले व ती काळी बाहुली मिरजकरांच्या चर्चेचा
विषय बनली. सांगलीतील काही भागात देवाला प्रसाद वाहणे,
करणी भानामती सारखे प्रयोग करणे, लिंबू-सुया
यासारख्या विचित्र गोष्टींचा सर्रास वापर होताना उमेदवारांकडून होताना दिसत आहे.
कोणी आपल्यावर करणी करु नये, आपले उमेदवार एकनिष्ठ
रहावेत, प्रतिस्पर्धीचा विजय होऊ नये यासारखी विविध कारणे
सदर गोष्टीची पाळेमुळे आहेत. सांगली मध्ये अंनिस
सारख्या संस्थांनी वेळोवेळी याविशयी प्रबोधने व कार्यशाळा घेऊन सुद्धा लोकांच्या
मानसिकतेत अपेक्षित बदल होताना दिसत नाहीत.
भारतीय
संविधानामध्ये भाग 9(क) नुसार महानगरपालिका व त्यांचे कार्य
तसेच एक भारताचा व्यक्ती म्हणून मतदानाचा हक्क आपल्याला दिला आहे या हक्काची परिभाषा
व सदरच्या प्रकरणांची व त्यामागच्या कारणांचा जर लेखाजोखा केला तर लोकप्रतिनिधी म्हणून
त्यांची असलेली जबाबदारीची जाणीव काहीशी पुसट होत असल्याचे दिसून येते.
समाजसेवेचा विडा घेवून फक्त जनतेच्या कल्याणाचा विचार यापूर्वी केला
असता तर ही आकस्मित भिती दाटून आली नसती. शाहू,
फुले, आंबेडकरांनी कर्मकांड मुक्त समाजाची
स्वप्ने पाहीली होती या स्वप्नांना कुठेतरी खीळ बसल्याचे अशा काही गोष्टीतून
जानवते. एक सच्चा उमेदवार म्हणून फक्त आणि फक्त
जनतेच्या कल्यानाचा विचार कसा करता येईल व त्यातून अपेक्षित बदल कसा साधता येईल
आणि यातूनच हा समाज मतितार्थाने हे राष्ट्र कसे उन्नत बनवता येईल याचा सारासार विचार
केला गेला पाहिजे तरच या महापुरुषांनी दिलेल्या बलिदानाचे सार्थक होईल.
No comments:
Post a Comment