Saturday, 4 April 2020

गोळाबेरीज.........



                                                            लेखक – प्रविण पारसे     
                                  
आज सकाळी सकाळी लवकर आवरून बाहेर पडायच्या घाईत असतानाच अचानक फोन खनानला.. पलीकडून आवाज आला ‘सर आज सुट्टी पाहिजे.’ त्या आवाजामागची काळजी आणि आर्त विनंती मला जास्त रोखून धरता आली नाही आणि मी लगेच होकार दिला. सुट्टी ची विनवणी करणं ती पण इतकी अचानक यापाठीमागे निच्छितच काही महत्वाचे कारण असू शकते हा अंदाज लावणे देखील मला गरजेचे वाटले नाही कारण मला निच्छित माहिती होता माझा स्टाफ कधीही या उत्तम नात्याचा गैरवापर करणार नाही. सदर ठिकाणी काम करत दीड वर्षे कधी उलटून गेली कळलीसुद्धा नाहीत. सुरुवात झाली ती एका पेपर मधल्या छोट्या जाहिरातीपासून आणि शेवट होतोय एका खूप मोठ्या परिवारापर्यंत. अर्थातच हा शेवट म्हणता येणार नाही ही तर एक नवीन दिशा आहे असे म्हणने वावगे ठरणार नाही. निच्छित स्थळी जाण्यासाठी हमरस्त्यावरून योग्य त्या ठिकाणी आवश्यक ती वळणे घ्यावी लागतात त्यातीलच हे एक वळण.
मी नवखा असतानासुद्धा सगळ्याकडून मिळालेली त्यांच्या अनुभवाची शिदोरी कौतुकास्पद आहे. मनुष्याने आयुष्यभार शिकत राहीले पाहिजे या उक्तीप्रमाणेच नेहमी माझ्या स्टाफकडून जे काही मिळेल ते शिकत राहिलो आणि हळू हळू त्याची भली मोठी शिदोरी घेऊन येथवर पोचलो. या शिदोरीचे अनेक विविध पैलू आहेत. काही लोकांचा निरागसपणा, काहींचा संयम, काही व्यक्तीची काम करण्याची हातोटी, काहींच संभाषण, कुणाचं लिखाण अशा विविध गोष्टी मला या शिदोरीमध्ये ठेवण्यास मिळाल्या. शब्द देखील अपुरे पडतील असे बहुरंगी व्यक्तीसोबत काम करण्याची मजाच काही और.
आपले श्रीमान आजाराशी झुंज देत असताना देखील त्यांच्या सोबत तीन मुलांना सांभाळत उभारलेला संसार आणि त्यामागची धडपड पाहून डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. स्वतः एकटीने जिद्दीने आपल्या दोन मुलीना त्यांच्या पायावर उभे करताना केलेली कसरत आणि काटकसरसुद्धा कधी या नजरेतून सुटली नाही. घरच्यांचा म्हणावा तसा आधार नसताना देखील स्वत:च्या मुलाला जिद्दीने शिकवणारी आणि तेवढ्याच जिद्दीने शेतीवाडी कडे लक्ष देणारी, एकाच वेळी आई आणि आजी अशी दुहेरी भूमिका सांभाळणारी माणस मला मिळाली. काम हे काम न समजता हसत खेळत पूर्ण करून नेहमीच इरसाल आणि गावातल्या राजकारणात सक्रीय राहणारी मानस देखील पहावयास मिळाली. नवऱ्याचे आणि आता वडिलांचे छत्र हरवून देखील समाजकार्यास वाहून घेणाऱ्या रणरागीनीची भेट सुद्धा इथलीच. अस्सल गावरान ठेका साभाळत इंग्रजी येत नसताना सुद्धा खंबीरपणे कार्यरत असणारी व्यक्ती मिळण्यासाठी सुद्धा खूप मोठ भाग्य असाव लागत. आई - वडील आणि बायको – मुलगी या दोनही बाजूंचा समतोल सांभाळत कामात जीव ओतणारी मानस तीही इथलीच. गावाकडची शेती, घरदार सोडून काम आणि शिक्षण यासाठी बाहेर पडून भविष्यात  व्यावसायिक समाजकार्यात भरीव योगदान देण्यास समर्थ असणारे व्यक्तीदेखील मला माझ्या या कार्यकाळात बघायला मिळाल्या. आपल्या मुलाला मुंबईला शिक्षणासाठी पाठवून त्याला पाठिबा देत संसाराचा गाडा ओढत काम करणारी अभ्येद्य मानस देखील मला भेटली. अशा या वेगवेगळ्या व्यक्तीरेखांना सांभाळत हसत खेळत ही वेळ कशी निघून गेली तते कधी समजलच नाही. एकान म्हंटलय की वेळ ही नेहमी निघून जाण्यासाठीच असते. पण निघून गेलेली वेळी आपल्या आयुष्यात कशी सार्थकी लागून निघून गेली याची सुद्धा गोळाबेरीज आपण केली पाहीजे असं मला वाटत. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या उक्तीप्रमाणेच विविध व्यक्तीसोबत काम करत असताना मीही त्यांच्यात कधी एकरूप होऊन गेलो समजलच नाही. काहींचे खूप कटू अनुभव देखील जवळून पहिले आणि काहींचे हर्षोउल्हासित होणारे क्षणही अनुभवले. या सर्व अनुभावातून एक गोष्ट मात्र जाणवली की आपले वेगळेपण सिद्ध करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपली एकरूपता सिद्ध केली तर निच्छितच आपले काम हे सार्थकी लागेल आणि केलेल्या कामाचे समाधान देखील मिळेल.
           भगवान गौतम बुद्ध म्हणाले होते, ‘अंदाज गलत हो सकता है लेकीन अनुभव नही’. या विधानाप्रमानेच त्यांच्याकडे असणाऱ्या अनुभवाचा, ज्ञानाचा यथार्थ वापर करण्यात मी यशस्वी झालो त्याला अर्थातच साथ मिळाली ती आपुलकीची आणि गोड नातेसंबंधांची. काही लोक म्हणतात की कामाच्या ठिकाणी नेहमी प्रोफेशनल (म्हणजेच व्यावसाईक) असलं पाहिजे, पण माझ्या अनुभवानुसार कामात व्यावसाईकपणा असावा पण त्याने जोडलेली माणसं दुरावता कामा नयेत. बोलण्यात गरजेनुसार कटुता असावी पण त्यामागची गोडी सुद्धा अनुभवता यावी. आतापर्यंतच्या आयुष्यात मी नेहमी विद्यार्थी या भूमिकेत वारंवार राहण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी म्हणजे फक्त शाळेत जाऊन शिकणे या भावनेतून नाही तर आपल्याला भेटलेल्या व्यक्तीकडून नेहमी नवीन काही शिकता येईल का या उद्देशाने विद्यार्थी. इथे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत मी मित्र, विद्यार्थी, शिक्षक, भाऊ यासारख्या विविध भूमिकेत राहण्याचा प्रयत्न केला. व्यक्ती ही कधीही वाईट नसते तर परिस्थिती त्या व्यक्तीस वाईट बनण्यास प्रोत्साहित करीत असते. इथे आजवर मिळालेल्या प्रेमाने जग देखील जिंकता येईल एवढी ताकद मनगटात साठवलेली जाणवते. आणि शेवटी मनगटात प्रेमाची ताकद जरी सामावली असली तरी विरहाचे अश्रू डोळ्यातून हालत नाहीत याची मनाला खूप भीती वाटते.     

Tuesday, 17 December 2019

जगाला प्रेम अर्पावे.....




शब्दांकन – प्रवीण पारसे


हिवाळ्याचा महिना असून सुद्धा रोज बोचणारी थंडी आज तितकीशी जाणवत नव्हती. सकाळी लवकर आटपून आज कामाच्या ओढीने वळलेली पावले थोड्याश्या आळसातून आल्यासारखी वाटत होती. अंगातला आळस झटकून जबाबदारीची जाणीव मनात होऊन मनात आलेल्या सुट्टीच्या इच्छेवर भला मोठा दगड ठेऊन आज महिलांच्या नवीन वसाहतीकडे नुकतेच पाय वळले. जवळचाच पण कधीच प्रसन्न न वाटणारा तो रोजचा बसचा प्रवास आज ही काही चुकला नव्हता. काही वेळातच ठरलेल्या उद्दीष्टाच्या दिशेने पाय वळले व ते येऊन ठेपले एका कचरा वेचक महिलांच्या राहत्या भागाजवळ. ऊन, वारा, पाऊस सतत अखंडपणे झेलणारी ती झोपडी त्या झोपडपट्टीत आजही त्याच डौलाने उभी होती. गोष्टीतल्या राजाराणीच्या आटपाट नगरीतल्या खळखळणाऱ्या झऱ्यासारखाच महानगरपालिकेचा सांडपाण्याचा नाला खळखळून निर्भीडपणे झोपडीच्या बाजूने वाट काढून वाहत होता. घराला घरे चिकटलेली, काही झोपड्या पत्र्याचा आधार असलेल्या तर काही फक्त लाकडी काठ्याच्या आधारवर असलेल्या प्लास्टिकच्या कागदावर तर काही पोत्याच्या शिवलेल्या जुनाट झालेल्या ताडपत्रीवरउभ्या होत्या. साधारण दुपारी १ नंतरची वेळ सूर्यदेव डोक्यावर येऊन सलामी देत होते, या गुलाबी थंडीत सुद्धा ऊन्हाचे अस्तित्व स्पष्ट जाणवत होते.
            या झोपड्या व त्याला लागून असलेल्या टोलेजंग इमारती यामधील रस्ता म्हणजे समाजातील भेदभाव व आर्थिक विषमता दर्शवणारी जणू रेषच होती. त्या एका झोपडीत वाकून शरीर सांभाळून प्रवेश केल्यावर आतील भयावह स्थितीची जाणीव झाली. झोपडीत मांडलेली चूल व त्यावर काळी झालेली जुनाट दोन पातेली व एक वर्षानुवर्षे चालत आलेला लोखंडी तवा. वळचणीला टाकलेली कपडे, गोधड्या काही मनातून हटत नव्हत्या. उंदीर, पालीच्या भक्ष्यापासून वाचलेल्या शिक्क्यावरून धुराने काळवंडलेल्या एका बांबूच्या बुट्टीत ठेवलेले भाकरीचे शिळे तुकडे वगळता तिथे खायचे सौदर्य काही दिसून आले नाही. काही वेळ उलटून गेल्यावर कामास सुरुवात केली व नवीन गट, त्यांचे फायदे, बचतीच्या सवयी आणि त्यातून मिळनारे आर्थिक लाभ सांगत असताना कधी दुपार झाली कळलीच नाही. तेवढ्यात दारात मुलींचा गलका आला आणि त्यातून दोन चुणचुणीत मुली सफाईदारपणे आत शिरल्या. शाळेचा ठीक ठिकाणी उसवलेला गणवेश, गणवेशावरील मळकट आणि जुनाट झालेला शाळेचा बिल्ला, चापून घातलेल्या दोन वेण्या आणि त्यावरील लाल रिबीन शाळेच्या अस्तित्वाची साक्ष देत होत्या. आल्या आल्या त्या मुलीनी आपल्या आईकडे आणि एकंदरीत वातावरणाकडे नजर टाकली  आणि भाकरीच्या बुट्टीकडे त्यांचे पाय वळले आणि आणि त्यांनी त्यातील वाळल्या भाकरी घेऊन खाण्यास सुरुवात केली. नियमित सवय असल्यामुळे बिनधास्त त्यांनी त्याचा खाण्याचा कार्यक्रम चालू ठेवला. पण हे दृश्य काही डोळ्याने बघवत नव्हते  आणि नकळतच तेथे आलेल्या व्यावसाईक समाजकार्यकर्त्यांनी आपला डबा काढून त्यांच्या समोर ठेवला पण त्या मुलीनी तो घेण्यास नकार दिला पण थोडासा हट्ट आणि प्रेमाने बोलल्यावर त्यांनी तो डबा आनंदाने आणि आपुलकीने स्वीकारला आणि त्या डब्यात असणारी चपाती-भाजी खाताना पुरणपोळी खाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. अश्या आनंदाच्या पलीकडे आयुष्यातील इतर गोष्टीचा आनंद फिका पडतो हे मात्र निश्चित. जेवण झाल्यावर दिलेल्या चोकलेटने त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद अगदी काळजात साठवून ठेवण्यासारखा होता हे मात्र निश्चित. बचत गटाच्या कामाचं औचित्य साधून या वसाहतीला झालेली भेट मनाला खूप काही शिकवून जात होती. शासनाची धोरणे भलेही खूप चांगली आणि गरिबांसाठी असोत पण त्यांना राबवणारी यंत्रणा हि अजून सुद्धा तळागाळापर्यंत पोहचू शकली नाही याची खूप खंत वाटते. आज झालेल्या या गोष्टीने खूप काही शिकवण दिली ती म्हणजे धोरण निर्मिती फक्त महत्वाची नसून त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा तितकी सक्षम असली पाहिजे, आणि ती असेल तरच या गरीब आणि गरजू लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल. आणि आज जश्या त्या मुलीच्या चेहऱ्यावर आनंद उमटला तसा आनंद बाकी सगळीकडे सुद्धा निश्चितच परावर्तित होईल हे मात्र नक्की.

(सामाजिक क्षेत्रात काम करत असताना इतर सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्या क्षेत्रीयकार्यात आलेले अनुभव लेखकाने प्रतिलिपीत केले आहेत.) 

Image Source: http://prahaar.in/


Friday, 30 August 2019

ओझ जाणिवांचं...?


 लेखक – प्रवीण पारसे



मागील काही दिवसात सांगली कोल्हापूर मध्ये आलेला जलप्रलय सर्वांनाच परिचित असावा. मागील कित्येक वर्षे सांगली जिल्हा ‘अखंड वाहते कृष्णामाई’ असे अभिमानाने म्हणायचा पण आता कृष्णामाईचं नाव देखील घ्यायची धास्ती वाटते ती या जलप्रलयामुळे. सांगली जिल्ह्यातील एकीकडे जत, आटपाडी, कवठे महांकाळ या तालुक्यातील कोरडा दुष्काळ व दुसरीकडे आलेला हा जलप्रलय. अनिश्चित, अतिप्रलयकारी, साधनसंपत्ती बरोबर माणसाची मनेही ढासळवून टाकणारा हा महापूर सांगलीकरांनी अनुभवला. घरे संसार, जनावरे उघड्यावर पडले, कित्येक उद्योगधंदे, शेतीपूरक व्यवसाय, कुटीरउद्योग, रस्ते, वाहतूक यंत्रणा इत्यादींचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हे आपण सर्वांनी पहिलेच, हे नुकसान लवकर न भरून येणारे आहे.
            महापुराचे संकट आल्यावर सुरवातीच्या दिवसापासून मी व माझे मित्र मदतीच्या कार्यात व्यस्त होतो. वैयक्तिक तसेच संस्था स्थरावर जशी जमेल तशी मदत करत राहिलो या मदतीच्या अनुशंगाने पूरपरिस्थिती व त्यामुळे होणारे नुकसान किती भयावह आहे याची जाण झाली. पूरग्रस्त लोकांच्या पुनर्वसनाच्या शिबिरामध्ये गेलो असता पहिल्या दोन दिवसामध्ये पाहिलेली परिस्थिती अत्यंत विदारक होती. अंगावर पांघरायला पांघरून नाहीत, पावसाने आणि पुराच्या पाण्याने भिजलेले कपडे बदलायला दुसरे कपडे नाहीत. लोकांच्या मदतीच्या हातातून  आलेले जेवण सुद्धा तोंडात घालवत नाही, डोळ्यातून फक्त अश्रूंच्या अखंड धारा आणि पुर कधी ओसरतोय, काय बातमी येते याकडे कान अशी स्थिती पहिल्या काही दिवसात पहावयास मिळाली. यामध्ये NDRF टीम, आर्मी व स्थानिक लोकांच्या सहकार्यातून हजारो लोकांचे प्राण वाचवण्यात आले. माझ्यासोबत मिरजेतील माझे सहकारी, मित्र, परिचित लोक आणि स्थानिक संस्था यांच्या मोलाच्या सहकार्याने मला जमेल तशी मी मदत करत राहिलो. प्रामुख्याने सोशल मिडीयाचा वापर करून पुणे, बेंगलोर येथून सुद्धा माझ्या मित्रांनी आर्थिक मदत पाठवली. स्थिती इतकी भयानक होती की पहिल्या चार ते पाच दिवसात बाहेरून येणारी मदत काहीच नव्हती फक्त स्थानिकांच्या सहकार्याने हे शक्य झाले. सांगली मधील मुख्य बाजारपेठ पाण्यात गेल्यावर जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा ठप्प झाले. मदत करणाऱ्या लोकांनी अक्षरशा मिरज व आसपासच्या गावातील सर्व दुकाने फिरून जमेल तसे साहित्या गोळा केले व गरजू लोकांच्या शिबिरापर्यत पोचवले.
दुसऱ्या आठवड्यात सोशल मिडीयाच्या मार्फत पुरपरिस्थितीची दृश्ये, चित्रफिती प्रसारित झाल्याने आजूबाजूच्या जिल्ह्यातून मदतीचा ओघ वाढला तो इतका होता की त्यामध्ये पुन्हा भ्रष्टाचार, राजकारण याचा शिरकाव झाला. काही लोकांनी तर बाहेरगावातून (तालुक्यातून/जिल्ह्यातून) येणारी मदत गावाच्या बाहेरच अडवून संस्था, गट, मंडळे यांच्या नावावर लंपास देखील केल्याचे पहावयास मिळाले. प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. नेहमीप्रमाणे वरातीमागून घोडे या संकल्पनेस आपले प्रशासन सार्थ ठरले. 
सांगली जिल्ह्यासाठी वरदान ठरलेली कृष्णामाई का विकोपाला गेली यावर मात्र तज्ञ लोकांच्या चर्चा, आरोप-प्रत्यारोपाला वेगळेच वळण मिळाल्याचे चित्र दिसत होते कधीही समाजकार्यात न दिसणारी नेतेमंडळी देखील आज जागी झाली होती, या महापुराने त्यांच्या कठोर हृदयाला समाजासेवेचा पान्हा फुटला हे विशेष. मागील काही दिवसात खूप काही अनुभव आले. दानशूर व्यक्तीचा दानशूरपणा देखील पहावयास  मिळाला तर काही ठिकाणी मदत करण्याची उदासीनता देखील दिसून आली.  पूर ओसरल्यावर शाळा कॉलेजच्या मार्फत होणारी साफसफाई देखील पहिली तर काही ठिकाणी हातात झाडू घेऊन केलेला दिखऊपणा पण देखील लपून राहिला नाही. एकंदरीत या पुरातून शिकण्यासारखे खूप काही मिळाले. माणसाची माणसाबद्दलची आस, प्रेम, संवेदना, येथे जाग्या झालेल्या दिसल्या. धर्म जातीचे बंध नष्ट करण्यास काही प्रमाणात हा पूर यशस्वी झाल्याचे वाटले काही ठिकाणी धर्मांद लोकांच्या मदतीचे हेवेदावे देखील पाहण्यास मिळाले.
सांगली आणि कोल्हापूर मध्ये थैमान घालून हा महापूर आपल्या मार्गे निघून गेला आणि जाताना जगण्याची नवी उम्मेद आणि आस माणसाला देऊन गेला. सध्या फक्त वरील गोष्टीचं चिंतन-मनन करून उपयोग नाही तर गरज आहे निस्वार्थ भाव जपण्याची मग ती माणुसकीविषयी असो वा निसर्गाविषयी.   

Sunday, 16 June 2019

करिअर निवडताना...


                                                                                                                                                    लेखक – प्रवीण पारसे
                        


                            आज सकाळपासून ऑफिसच्या कामात गर्क होतो तेवढ्यात माझा फोन वाजला एका मित्राने नुकतेच १२ वी पास केले होते आणि त्याला BA च्या प्रवेशप्रक्रियेतील विषय निवडीबद्दल माझ्याकडून मार्गदर्शन हवे होते, त्याअंती एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ती म्हणजे करिअरच्या वाटा निवडताना विध्यार्थ्यामध्ये असणारा संभ्रम. हा सावळा गोंधळ सावरण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस उपयोगी पडेल या अपेक्षेनं साकारलेला हा लेखप्रपंच.
                        सध्या मे महिना उलटून गेला आणि जूनही मध्यात आला आहे आणि हा काळ निसर्गाच्या मान्सूनच्या अल्ल्हाददायी आगमनाबरोबरच विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सुद्धा महत्वाच्या काळापैकी एक असे आवर्जून म्हणावे लागेल, त्याचे कारणही तसेच कारण या कालावधीमध्ये विद्यार्थ्याच्या आयुष्यातील करिअरची दिशा आणि दशा याच कालावधीत निश्चित होत असते. सध्या १० वी, १२ वी, नीट, जेईई यासोबतच इतर बऱ्याच परीक्षेंचे निकाल जाहीर झाले आहेत त्यामुळे सध्या सगळीकडेच पुढील शिक्षणासाठीची अडमिशनस् ची धावपळ सर्वत्र दिसून येत आहे. १० वी झालेल्या बऱ्याच विध्यार्थ्याच्या मध्ये खूप सारे गैरसमज आढळून येतात त्यापैकी काही म्हणजे ९०% पेक्षा जास्त गुण मिळाले तर विज्ञान शाखेत प्रवेश त्यापेक्षा कमी गुण मिळाले तर वाणिज्य आणि मग कला असा पसंतीक्रम १० वी च्या मार्कांवर ठरवला जातो मुळात असा पसंतीक्रम ठरवण्यापेक्षा आपला पाल्य भविष्यात काय करू इच्छितो यांचे अध्ययन जर पालकांनी केले तर निश्चितच पाल्याच्या आवडीच्या विषयात त्याला करिअर करता येऊ शकते भले त्याचे दहावीचे मार्क कितीही असोत. उच्च माध्यमिक शिक्षणाच्या निवडीत नेहमी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली  पाहिजे ती म्हणजे विद्यार्थ्याच्या आवडी निवडी काय आहेत त्या जाणून त्या संबंधित सर्व शिक्षण शाखांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यास दिली गेली पाहिजे अर्थातच त्यामध्ये असणाऱ्या काठीण्य पातळीविषयी सुद्धा विद्यार्थ्यास अवगत केले पाहिजे.
                        करिअरचे मार्ग निवडताना फक्त अभियांत्रिकी, वैद्यकीय, वकिली इत्यादीचा विचार न करता व्यावसयभिमुख  शिक्षणावर सुद्धा आवर्जून लक्ष केंद्रित केले पाहिजे. काही अभ्यासक्रम हे कमी कालावधीचे असून ते व्यावसायिक दृष्टिकोनातील असल्यामुळे नोकरीची हमी मिळवून देऊ शकतात. फाईन आर्ट्स, पेंटिंग, मूर्तीकला इत्यादीसारख्या विषयात सुद्धा आपल्या आवडीनुसार करिअरची निवड करता येऊ शकते. पारंपारिक वाटा सोडून कृषी अभ्यासक्रम, समाजकार्य क्षेत्र, स्पर्धा परीक्षा तसेच सध्या भारताच्या विकासाच्या अवस्थेत उपयोगी पडणारे तंत्रज्ञान याचा अभ्यास यासारख्या विविध गोष्टींचा आपण अगत्याने विचार केला पाहिजे.
                        Passion to Profession या इंग्रजी उक्तीप्रमाणे करिअरच्या वाट निवडताना आपण अगदी चोखंदळ राहील पाहिजे. बाजारातून भाजी आणताना सुध्दा आपण त्याची योग्य पारख केल्याशिवाय खरेदी करत नाही मग करिअरचा विचार करताना दुसऱ्याने केले म्हणून आपण ते का करायचे हा माझा सवाल ? लोक काय म्हणतील या भावनेला त्याच क्षणी नष्ट करता आले पाहिजे. लोक काय म्हणतील याहीपेक्षा आपले भविष्य या करिअर म्हधून कसे घडेल यातून आपला चरितार्थ कसा चालेल, आपण केलल्या कामाचे आपल्याला समाधान मिळेल का नाही या गोष्टीचा सातत्याने विचार केला गेला पाहिजे आणि त्यातूनच आपल्या करिअर ची निवड केली आहे.


Saturday, 24 November 2018

पूर्वजन्माची पुण्याई : आई



लेखक – प्रवीण पारसे

नेहमीप्रमाणे तो सोमवारचा कंटाळवाणा दिवस उजाडला. काही केल्या रविवारी केलेल्या आरामाचा क्षीण अंगातून जाईना. तरी पण आळस झटकून नाईलाजाने मन मारून सगळेजण आपल्या आपल्या ओढीने कामासाठी सकाळी बाहेर पडत होते. मी सुद्धा सकाळीच ऑफिसच्या कामाचे नियोजन करत होतो. माझ्या वेळेनुसार अगदी घडळाच्या काठावर मी आवरत  असतानाचा थोडासाच वेळ ऑफिस साठी बाकी असताना अचानक आईने एक संगीतले आणि मनाची इच्छा नसताना पार्किंग मधून बाईक काढली आणि त्यासाठी निघालो. मनात असंख्य विचारांचं काहूर. आज आठवड्याचा पहीला दिवस, कामाचे नियोजन, मध्ये घड्याळाकडे लक्ष  असे विचार मनात चालू होते. आईने सांगितलेलं काम घाईनेच उरकून घरी जाऊन आवरून ऑफिस ला जायचं या उद्देशानं थोडसं फास्ट गाडी चालवत घरी निघालो इतक्यात एका मावशीने माझ्या गाडीला हात केला. साधारण  ४० ते ४५ वय असलेल्या त्या मावशी चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांनी थोड्याश्या जास्त वयाच्या व थकलेल्या जाणवत होत्या. त्यांनी गाडीला हात केला हे मला लांबूनच समजले. ऑफिस ला होणाऱ्या घाईत आणि हे काय नवीन म्हणून मी मनाशी थोडा चिडलो. शेवटी गाडी थांबवून त्यांना लिफ्ट द्यायचा विचार केला आणि ब्रेक मारलाच. मी गाडी थांबवाताच त्यांच्या सुरकुतलेल्या व काळजीयुक्त चेहऱ्यावर एक स्मितहास्य उमटलेले माझ्या नजरेतून सुटू शकले नाही. काहीसा विचार करत त्यांनी मला लगेच बाळा म्हणून हाक मारली आणि कुठे चालला आहेस मला थोड्या आंतरावर सोडशील का अशी विचारणा केली.
त्यांच्या बोलण्यावरून काहीश्या गोष्टी स्पष्ट उमजत होत्या त्या म्हणजे त्यांची परिस्थिती मध्यमवर्गीय होती. साधारणता मनात असलेली घालमेल, विचारांचं काहूर, चिंता, काळजी हे सगळेच पैलू त्यांच्या चेहऱ्यातून दर्शन देत होत्या. त्यांनी विचारणा केल्यावर बसा काकी सोडतो तुम्हाला अशा आपुलकीच्या स्वरात त्यांना मी प्रतिसाद दिला आणि त्या लगेच गाडीवर बसण्यास प्रयत्न करू लागल्या. पण माझी बाईक थोडीसी उंच असल्याने त्यांना बसता येईना आणि त्या म्हणाल्या बाळ थोडे गुडघे दुखतात हल्ली म्हणून जरा त्रास होतो. असे बोलून काहीसा शरीराला त्रास करून त्या गाडीवर बसल्या आणि गाडी मी गाडी सुरु केली. मला काही अंतर गेल्यावर तमी त्यांना प्रश्न केला,”मावशी कुठून आलात, आणि कुठे निघाला आहात?” त्यावेळी त्यांनी मिरज पासून जवळच असलेल्या एका गावातून आल्याचे सांगितले आणि मिरजेतील एका ठिकाणी जायचे आहे आणि त्याचे कारण म्हणजे देव. त्यांचा एक इष्टीत देवाला नारळ  अर्पण करण्यासाठी त्या इतक्या लांबून आल्या होत्या. अशी बरीच मुलभूत विचारणा झाली असल्या त्यांनी मला विचरले काय करतोस तू सध्या बाळ, कुठे शिकतोस की नोकरी करतोस? मी त्यांना सागितले आताच शिक्षण पूर्ण केले आणि सध्या नोकरी करतो. त्यावर लगेच त्यांनी वेगळाच प्रश्न किला बाळा ही गाडी  किती रुपयाची आहे ? अचानक त्यांनी गाडी विषयी प्रश्न केला आणि मी थोडा विचारता पडलो. मी विचार करत होतो तेवढ्यात त्या बोलल्या की माझ्या मुलाला गाडी घ्यायची अशी साधारणता २ ते ३ वर्षे वापरलेली. त्या बोलल्या की त्यांच्या मुलाने गाडी पाहून पण ठेवलीये आणि त्याला ३० हजार रुपये खर्च आहे. सध्या अडचण अशी आहे की ३० हजार उभारायचे कुठून ? त्या मला सांगत होत्या की एक २ तोळ्याची अगठी आहे ती विकून मुलाला गाडी घ्यायचा त्यांचा विचार होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी बिनदिक्कत त्या मला सांगत होत्या ? मी विचारात पडलो आणि मग माझ्या मनात सुद्धा विविध प्रश्न आले असे प्रश्न की त्याच्या उत्तराशिवाय मी पुढे काहीच विचर करू शकणार नाही. मी त्यांना त्यांचा मुलगा काय करतो ? त्याचे वय ? सध्या कोठे काम करतो का ? असे विविध प्रश्न विचरले तर मला त्याचे खूप चिंताजनक उत्तरे त्या काकींच्या बोलण्यातून जाणवली ती अशी, त्या म्हणाल्या मुलगा आता साधारण २२ वर्षे वयाचा आहे. सध्या बी.कॉम मधील राहिलेले विषय सोडवत घरीच असतो सध्या, आणि एक दुर्देवी बाब अशी कळली की तो सध्या दिवसभर मोबाईलवर काहीबाही करत घरीच असतो. आणि कामाला जा म्हंटले तर गाडी घेऊन दिली तरच कामाला जाईन असे म्हणतो. त्याच्या वडिलांना आता काम करवत नाही आणि काम सहन ही होत नाही तरीसुद्धा संसाराचा गाडा चालवायला ते एम.आय.डी.सी. मधील एका कारखान्यात कामाला जातात आणि घर चालवतात. अशी काही उत्तरे ऐकून मी सुन्न झालो.
या गोष्टी समजल्यावर मी त्यांना बोललो की मुलाला पहिला कुठेतरी त्याच्या कुवतीप्रमाणे / शिक्षणानुसार  कामाला सुरुवात करायला सांगा आणि त्याच्या स्वतःच्या पगारातून गाडी घ्यायला सांगा. म्हणजे त्याला पैशाची किंमत कळेल आणि तुम्हाला आर्थिक बुर्दंड होणार नाही. तुमचे सोने किंवा तुमच्या पुढील आयुष्यासाठी ठेवलेली अमानत अशी मुलांवर खर्च केलीत तर आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तुम्हाला स्वतःसाठी काहीच पैसे शिल्लक राहणार नाहीत आणि मग त्यावेळी परिस्थिती खूप बिकट असेल असे काहीसे मी सांगत होतो इतक्यात त्यांना जिथे उतरायचे होते ते ठिकाण आले त्यांनी मला खुणावून थांब असे सांगितले आणि त्या गाडीवरून उतरल्या. माझ्याशी बोलल्यावर किंचित त्यांच्या मनावरचा ताण हलका झाल्यासारखे मला जाणवले. “बर जाते मी बाळ इथून जवळच आहे मंदिर” असे म्हणून त्यांनी मला सावकाश जा असे काळजीपोटी सांगितले आणि शेवटी माझ्याही मनातून “काळजी घ्या काकी” असा शब्द आला आणि त्या प्रवासाचा शेवट झाला. आयुष्याची घडी सांभाळत स्वतःचा काडीमात्र सुद्धा विचार न करणारी ती प्रेमळ  माय पाठमोरी मला दिसत होती आणि आईच्या या उद्दात कर्तुत्वाचे ज्ञान त्या व्यक्तीकडे बघून मला होत होते. आयुष्यात खूप काही गोष्टी पहिल्या खूप गोष्टी अनुभवल्या पण स्वतः उपाशी राहून आधी आपल्या लेकरांना पोटभर खायला घालणाऱ्या आईची सर जीवनातील कुठ्ल्यास नात्याला येत नाही ते आज उभ्या डोळ्यांनी पहिले आणि अनुभवले.

Thursday, 25 October 2018

लाल डब्याची नाळ


                                                       
लेखक – प्रविण पारसे

दिवस मावळनीला लागला होता, प्रवाशांची घरी परतण्याची लगबग दिसून येत होती. शाळेच्या पोरांची बस केव्हा लागते आणि कधी आपल्या गावी जातो ह्या गोष्टीची प्रचंड आस मनातून जाणवत होती. घसा कोरडा पडलेला असताना सुद्धा पाण्यासाठी गेल्यावर पुढील बस चुकेल म्हणून कित्येक लोक ऑक्टोंबर महिन्यातील त्या सूर्यदेवाच्या दाहकतेला सहन करत आतुरतेने लाल डब्याची वाट पाहत होते. सर्व महाविद्यालयीन तरुणी नेहमीप्रमाणे बस स्थानकाच्या एका ठराविक जागेत दाटीवाटीने जमा झालेल्या दिसल्या. वृद्ध महिला व पुरुष चवड्यावर बसून कपाळाला हात लाऊन दुरूनच गाडीची वाट पाहत स्वत:च तोंडाशी काहीतरी पुटपुटत घरी जाण्याच्या ओढीने कासावीस झालेले दिसत होत्या. मीही आज ऑफिस च्या कामानिम्मत जत च्या स्थानकावर होतो, कामाचा व्याप सकाळीच आवरला मग विचार केला आजोळी जाण्याच्या. जत पासून साधारण ३० ते ३५ किमी च्या अंतरावर माझे आजोळ. नेहमीप्रमाणे दुष्काळी भागाला शेतीच्या टंचाईप्रमाणेच दळनवळनाची सुद्धा टंचाई. या सर्व गोष्टीवर सर्वांचा भरवसा फक्त लाल डब्याच्या गाडीवर ते म्हणजेच आपले महामंडळ. लहानपणापासून या मार्गावर खूप प्रवास झाले, खूप काही पहिले अनुभवले फक्त आज हे सर्व मनातून कागदावर उतरवण्यासाठी हा लेखप्रपंच. 
इतक्यात बस स्थानकातील निरीक्षकाने माईक वर पुकारले की संबंधित गावी जाणारी बस संबंधित फलाट वर उभी आहे असे निरीक्षकाने पुकारताच एकाच कल्लोळ माजला लोक हातातील गाठोडी आणि पिशव्या सावरत फलाटाच्या दिशेने पळताना दिसत होते, पळत असताना निरीक्षक अजून त्या गाडी बद्दल काहिती माईक वर पुकारत आहे  याचेही त्यांना भान नव्हते. हे सर्व चालू असताना आतील वर्कशॉप मधील एक जुनी रंग उडालेली गाडी हळूहळू त्या फलाटाच्या दिशेने येत होती. गाडीचा उडालेला रंग आणि इंजिन आणि ब्रेक चा कर्कश आवाज त्या गाडीच्या उभ्या आयुष्यातील लोकसेवेची साक्ष देत होता. हे सर्व चित्र चालू असतानाचा गाडी येऊन थांबली तोच सर्वाची घाई त्या गाडीत चढायची ती गाडी होती जत ते इंचगिरीमठ या मार्गावरील, सदर मार्ग जत-वळसंग-शेड्याळ-दरीकोनुर-दारीबडची इत्यादी सर्व मार्गावर प्रवास करून ती तिचा टप्पा गाठणार होती.
            बस आल्यावर तोच बसच्या वाहकाने बसचा दरवाजा एका विशिष्ट कलेने उघडला तोच प्रवाश्याची आत चढन्याची घाई. महाविद्यालयीन तरुणांनी आधीच खिडकीतून रुमाल आणि कॉलेजची दप्तरे टाकून जागा बळकावल्या होत्या, इकडे महिला गाडीत जाण्यास धडपडत होत्या, हातातील दोन कापडी पिशव्या सांभाळत दुसरीकडे आपल्या बारक्या मुलाला पुढे करत गाडीत जागा मिळेल या आशेने महिलांची लगबग चालू होती. शाळेच्या आणि कॉलेजच्या मुली एका बाजूला थांबून पुरुषी अहंकाराला आधी वाट देत होत्या ते सर्व झाल्यावर त्या गाडीत गेल्या. या सर्व धांदलीत एक साधारण वयाने १८ ते १९ वय असलेला, घामाने चिंब भिजलेला पण चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असलेला मुलगा हातात उसाच्या रसाचे ग्लास घेऊन गाडीतल्या गर्दीत बिनदिक्कत शिरला जणू काय गाडी म्हणजे आपले घरच. तो गाडीत शिरताच कंडक्टरने कापाळाला आठ्या घालून फक्त त्याच्याकडे पहिले पण तो काही बोलला नाही. आपण या संकल्पनेला शहरी भाषेत म्हणतो म्युच्युअल अंडरस्टੱੱडिंग. बस च्या ड्रायव्हरने बस चालू केली आणि काही अंतर स्थानकाच्या बाहेर येताच एक नऊवारी साडी नेसलेली एक बाई तिच्या दोन लहान लेकरांसह एक छोटसं पोत सांभाळत गाडीच्या दिशेने पुढून पळत आली आणि तिने गाडीला हात केला, बस च्या वाहकाने काहीश्या नाराजीच्या स्वरानेच गाडीची बेल मारून तिला व त्या लहान पोरांना गाडीत घेतले. अश्या प्रकारे शेवटी गाडी जतच्या बाहेर पडलीच आणि मुख्य मार्गाला लागली तोच चालक आणि वाहकाने सुस्कारा सोडला. अजून एक खुओ मोठे दिव्य वाहकाला पार पाडायचे होते ते म्हणजे बसमधील सर्वाची तिकिटे काढणे होय, दिव्यचं ते ! इतक्या गर्दीत हे अवघड काम पार पडण्याचे ! तरीही मोठ्या चपळाईने आणि कन्नड भाषेचा वापर करून साधारण पंधरा एक मिनिटात त्याने लीलया हे काम पार पाडले. गाडी काही मिनिटांनी वळसंग या गावात पोचली तिथे पहिले तर मी थक्कच झालो. साधारण १७ ते १८ शाळेतील मुलींचा एक घोळका बसची आतुरतेने वात पाहत असताना दिसून आला. आता या सगळ्या मुली या बस मध्ये कश्या बसणार हा खूप मोठा प्रश्न प्रवाश्यांना भेडसावत होता, पण वाहकाने हे काम सुद्धा लीलया करून दाखवले.
अश्या प्रकारे हा प्रवास साधारण एका तासात माझ्या आजोळी येऊन थांबला व मी बस मधून बाहेर पडलो सूर्यदेव आता जवळपास झोपेच्या अधीन झाले होते त्यांनी त्यांची प्रखरता कमी केली होती. त्या मंद उजेडात पाठमोऱ्या लाल आकृतीकडे पाहत या महान सेवेस मनोमन शाबासकी देत मी घरी पोहोचलो. 

Tuesday, 24 July 2018

निवडणूक आणि अंधश्रद्धा - एक विचार


                    सध्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असून सध्या सर्व भागांमध्ये सर्व पक्षातील उमेदवारांनी आपल्या प्रचाराची घोडदौड सुरु केली आहे. तसे पाहता सध्याचे युग हे हायटेक म्हणजेच तंत्रज्ञानाचे युग समजतो.  निवडणूक प्रचारासाठी सोशल मिडिया, टेलिव्हिजनस् यासारख्या नवनविन संकल्पना एकीकडे राबवत असतानाच दुसरीकडे पारंपारिक विचारांनी युक्त असलेल्या विचित्र घटना या वेळी पाहावयास मिळत आहेत.  दोनच दिवसामध्ये मिरज शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी टांगलेल्या एका काळया बाहूलीने लोकांचे लक्ष वेधून घेतले व ती काळी बाहुली मिरजकरांच्या चर्चेचा विषय बनली.  सांगलीतील काही भागात देवाला प्रसाद वाहणे, करणी भानामती सारखे प्रयोग करणे, लिंबू-सुया यासारख्या विचित्र गोष्टींचा सर्रास वापर होताना उमेदवारांकडून होताना दिसत आहे.  कोणी आपल्यावर करणी करु नये, आपले उमेदवार एकनिष्ठ रहावेत, प्रतिस्पर्धीचा विजय होऊ नये यासारखी विविध कारणे सदर गोष्टीची पाळेमुळे आहेत.  सांगली मध्ये अंनिस सारख्या संस्थांनी वेळोवेळी याविशयी प्रबोधने व कार्यशाळा घेऊन सुद्धा लोकांच्या मानसिकतेत अपेक्षित बदल होताना दिसत नाहीत.
                      भारतीय संविधानामध्ये भाग 9(क) नुसार महानगरपालिका व त्यांचे कार्य तसेच एक भारताचा व्यक्ती म्हणून मतदानाचा हक्क आपल्याला दिला आहे या हक्काची परिभाषा व सदरच्या प्रकरणांची व त्यामागच्या कारणांचा जर लेखाजोखा केला तर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची असलेली जबाबदारीची जाणीव काहीशी पुसट होत असल्याचे दिसून येते.  समाजसेवेचा विडा घेवून फक्त जनतेच्या कल्याणाचा विचार यापूर्वी केला असता तर ही आकस्मित भिती दाटून आली नसती.  शाहू, फुले, आंबेडकरांनी कर्मकांड मुक्त समाजाची स्वप्ने पाहीली होती या स्वप्नांना कुठेतरी खीळ बसल्याचे अशा काही गोष्टीतून जानवते.  एक सच्चा उमेदवार म्हणून फक्त आणि फक्त जनतेच्या कल्यानाचा विचार कसा करता येईल व त्यातून अपेक्षित बदल कसा साधता येईल आणि यातूनच हा समाज मतितार्थाने हे राष्ट्र कसे उन्नत बनवता येईल याचा सारासार विचार केला गेला पाहिजे तरच या महापुरुषांनी दिलेल्या बलिदानाचे सार्थक होईल.

गोळाबेरीज.........

                                                            लेखक – प्रविण पारसे                                          आज सकाळी स...