मागील काही दिवसात सांगली कोल्हापूर मध्ये आलेला
जलप्रलय सर्वांनाच परिचित असावा. मागील कित्येक वर्षे सांगली जिल्हा ‘अखंड वाहते
कृष्णामाई’ असे अभिमानाने म्हणायचा पण आता कृष्णामाईचं नाव देखील घ्यायची धास्ती
वाटते ती या जलप्रलयामुळे. सांगली जिल्ह्यातील एकीकडे जत, आटपाडी, कवठे महांकाळ या
तालुक्यातील कोरडा दुष्काळ व दुसरीकडे आलेला हा जलप्रलय. अनिश्चित, अतिप्रलयकारी,
साधनसंपत्ती बरोबर माणसाची मनेही ढासळवून टाकणारा हा महापूर सांगलीकरांनी अनुभवला.
घरे संसार, जनावरे उघड्यावर पडले, कित्येक उद्योगधंदे, शेतीपूरक व्यवसाय,
कुटीरउद्योग, रस्ते, वाहतूक यंत्रणा इत्यादींचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
हे आपण सर्वांनी पहिलेच, हे नुकसान लवकर न भरून येणारे आहे.
महापुराचे संकट आल्यावर सुरवातीच्या
दिवसापासून मी व माझे मित्र मदतीच्या कार्यात व्यस्त होतो. वैयक्तिक तसेच संस्था स्थरावर
जशी जमेल तशी मदत करत राहिलो या मदतीच्या अनुशंगाने पूरपरिस्थिती व त्यामुळे होणारे
नुकसान किती भयावह आहे याची जाण झाली. पूरग्रस्त लोकांच्या पुनर्वसनाच्या
शिबिरामध्ये गेलो असता पहिल्या दोन दिवसामध्ये पाहिलेली परिस्थिती अत्यंत विदारक
होती. अंगावर पांघरायला पांघरून नाहीत, पावसाने आणि पुराच्या पाण्याने भिजलेले
कपडे बदलायला दुसरे कपडे नाहीत. लोकांच्या मदतीच्या हातातून आलेले जेवण सुद्धा तोंडात घालवत नाही,
डोळ्यातून फक्त अश्रूंच्या अखंड धारा आणि पुर कधी ओसरतोय, काय बातमी येते याकडे
कान अशी स्थिती पहिल्या काही दिवसात पहावयास मिळाली. यामध्ये NDRF टीम, आर्मी व
स्थानिक लोकांच्या सहकार्यातून हजारो लोकांचे प्राण वाचवण्यात आले. माझ्यासोबत
मिरजेतील माझे सहकारी, मित्र, परिचित लोक आणि स्थानिक संस्था यांच्या मोलाच्या
सहकार्याने मला जमेल तशी मी मदत करत राहिलो. प्रामुख्याने सोशल मिडीयाचा वापर करून
पुणे, बेंगलोर येथून सुद्धा माझ्या मित्रांनी आर्थिक मदत पाठवली. स्थिती इतकी
भयानक होती की पहिल्या चार ते पाच दिवसात बाहेरून येणारी मदत काहीच नव्हती फक्त
स्थानिकांच्या सहकार्याने हे शक्य झाले. सांगली मधील मुख्य बाजारपेठ पाण्यात
गेल्यावर जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा ठप्प झाले. मदत करणाऱ्या लोकांनी अक्षरशा मिरज
व आसपासच्या गावातील सर्व दुकाने फिरून जमेल तसे साहित्या गोळा केले व गरजू लोकांच्या
शिबिरापर्यत पोचवले.
दुसऱ्या आठवड्यात सोशल मिडीयाच्या मार्फत
पुरपरिस्थितीची दृश्ये, चित्रफिती प्रसारित झाल्याने आजूबाजूच्या जिल्ह्यातून
मदतीचा ओघ वाढला तो इतका होता की त्यामध्ये पुन्हा भ्रष्टाचार, राजकारण याचा
शिरकाव झाला. काही लोकांनी तर बाहेरगावातून (तालुक्यातून/जिल्ह्यातून) येणारी मदत
गावाच्या बाहेरच अडवून संस्था, गट, मंडळे यांच्या नावावर लंपास देखील केल्याचे
पहावयास मिळाले. प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.
नेहमीप्रमाणे वरातीमागून घोडे या संकल्पनेस आपले प्रशासन सार्थ ठरले.
सांगली जिल्ह्यासाठी वरदान ठरलेली कृष्णामाई का
विकोपाला गेली यावर मात्र तज्ञ लोकांच्या चर्चा, आरोप-प्रत्यारोपाला वेगळेच वळण
मिळाल्याचे चित्र दिसत होते कधीही समाजकार्यात न दिसणारी नेतेमंडळी देखील आज जागी झाली
होती, या महापुराने त्यांच्या कठोर हृदयाला समाजासेवेचा पान्हा फुटला हे विशेष. मागील
काही दिवसात खूप काही अनुभव आले. दानशूर व्यक्तीचा दानशूरपणा देखील पहावयास मिळाला तर काही ठिकाणी मदत करण्याची उदासीनता
देखील दिसून आली. पूर ओसरल्यावर शाळा कॉलेजच्या
मार्फत होणारी साफसफाई देखील पहिली तर काही ठिकाणी हातात झाडू घेऊन केलेला दिखऊपणा
पण देखील लपून राहिला नाही. एकंदरीत या पुरातून शिकण्यासारखे खूप काही मिळाले.
माणसाची माणसाबद्दलची आस, प्रेम, संवेदना, येथे जाग्या झालेल्या दिसल्या. धर्म
जातीचे बंध नष्ट करण्यास काही प्रमाणात हा पूर यशस्वी झाल्याचे वाटले काही ठिकाणी
धर्मांद लोकांच्या मदतीचे हेवेदावे देखील पाहण्यास मिळाले.
सांगली आणि कोल्हापूर मध्ये थैमान घालून हा
महापूर आपल्या मार्गे निघून गेला आणि जाताना जगण्याची नवी उम्मेद आणि आस माणसाला
देऊन गेला. सध्या फक्त वरील गोष्टीचं चिंतन-मनन करून उपयोग नाही तर गरज आहे
निस्वार्थ भाव जपण्याची मग ती माणुसकीविषयी असो वा निसर्गाविषयी.
No comments:
Post a Comment