Tuesday, 17 December 2019

जगाला प्रेम अर्पावे.....




शब्दांकन – प्रवीण पारसे


हिवाळ्याचा महिना असून सुद्धा रोज बोचणारी थंडी आज तितकीशी जाणवत नव्हती. सकाळी लवकर आटपून आज कामाच्या ओढीने वळलेली पावले थोड्याश्या आळसातून आल्यासारखी वाटत होती. अंगातला आळस झटकून जबाबदारीची जाणीव मनात होऊन मनात आलेल्या सुट्टीच्या इच्छेवर भला मोठा दगड ठेऊन आज महिलांच्या नवीन वसाहतीकडे नुकतेच पाय वळले. जवळचाच पण कधीच प्रसन्न न वाटणारा तो रोजचा बसचा प्रवास आज ही काही चुकला नव्हता. काही वेळातच ठरलेल्या उद्दीष्टाच्या दिशेने पाय वळले व ते येऊन ठेपले एका कचरा वेचक महिलांच्या राहत्या भागाजवळ. ऊन, वारा, पाऊस सतत अखंडपणे झेलणारी ती झोपडी त्या झोपडपट्टीत आजही त्याच डौलाने उभी होती. गोष्टीतल्या राजाराणीच्या आटपाट नगरीतल्या खळखळणाऱ्या झऱ्यासारखाच महानगरपालिकेचा सांडपाण्याचा नाला खळखळून निर्भीडपणे झोपडीच्या बाजूने वाट काढून वाहत होता. घराला घरे चिकटलेली, काही झोपड्या पत्र्याचा आधार असलेल्या तर काही फक्त लाकडी काठ्याच्या आधारवर असलेल्या प्लास्टिकच्या कागदावर तर काही पोत्याच्या शिवलेल्या जुनाट झालेल्या ताडपत्रीवरउभ्या होत्या. साधारण दुपारी १ नंतरची वेळ सूर्यदेव डोक्यावर येऊन सलामी देत होते, या गुलाबी थंडीत सुद्धा ऊन्हाचे अस्तित्व स्पष्ट जाणवत होते.
            या झोपड्या व त्याला लागून असलेल्या टोलेजंग इमारती यामधील रस्ता म्हणजे समाजातील भेदभाव व आर्थिक विषमता दर्शवणारी जणू रेषच होती. त्या एका झोपडीत वाकून शरीर सांभाळून प्रवेश केल्यावर आतील भयावह स्थितीची जाणीव झाली. झोपडीत मांडलेली चूल व त्यावर काळी झालेली जुनाट दोन पातेली व एक वर्षानुवर्षे चालत आलेला लोखंडी तवा. वळचणीला टाकलेली कपडे, गोधड्या काही मनातून हटत नव्हत्या. उंदीर, पालीच्या भक्ष्यापासून वाचलेल्या शिक्क्यावरून धुराने काळवंडलेल्या एका बांबूच्या बुट्टीत ठेवलेले भाकरीचे शिळे तुकडे वगळता तिथे खायचे सौदर्य काही दिसून आले नाही. काही वेळ उलटून गेल्यावर कामास सुरुवात केली व नवीन गट, त्यांचे फायदे, बचतीच्या सवयी आणि त्यातून मिळनारे आर्थिक लाभ सांगत असताना कधी दुपार झाली कळलीच नाही. तेवढ्यात दारात मुलींचा गलका आला आणि त्यातून दोन चुणचुणीत मुली सफाईदारपणे आत शिरल्या. शाळेचा ठीक ठिकाणी उसवलेला गणवेश, गणवेशावरील मळकट आणि जुनाट झालेला शाळेचा बिल्ला, चापून घातलेल्या दोन वेण्या आणि त्यावरील लाल रिबीन शाळेच्या अस्तित्वाची साक्ष देत होत्या. आल्या आल्या त्या मुलीनी आपल्या आईकडे आणि एकंदरीत वातावरणाकडे नजर टाकली  आणि भाकरीच्या बुट्टीकडे त्यांचे पाय वळले आणि आणि त्यांनी त्यातील वाळल्या भाकरी घेऊन खाण्यास सुरुवात केली. नियमित सवय असल्यामुळे बिनधास्त त्यांनी त्याचा खाण्याचा कार्यक्रम चालू ठेवला. पण हे दृश्य काही डोळ्याने बघवत नव्हते  आणि नकळतच तेथे आलेल्या व्यावसाईक समाजकार्यकर्त्यांनी आपला डबा काढून त्यांच्या समोर ठेवला पण त्या मुलीनी तो घेण्यास नकार दिला पण थोडासा हट्ट आणि प्रेमाने बोलल्यावर त्यांनी तो डबा आनंदाने आणि आपुलकीने स्वीकारला आणि त्या डब्यात असणारी चपाती-भाजी खाताना पुरणपोळी खाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. अश्या आनंदाच्या पलीकडे आयुष्यातील इतर गोष्टीचा आनंद फिका पडतो हे मात्र निश्चित. जेवण झाल्यावर दिलेल्या चोकलेटने त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद अगदी काळजात साठवून ठेवण्यासारखा होता हे मात्र निश्चित. बचत गटाच्या कामाचं औचित्य साधून या वसाहतीला झालेली भेट मनाला खूप काही शिकवून जात होती. शासनाची धोरणे भलेही खूप चांगली आणि गरिबांसाठी असोत पण त्यांना राबवणारी यंत्रणा हि अजून सुद्धा तळागाळापर्यंत पोहचू शकली नाही याची खूप खंत वाटते. आज झालेल्या या गोष्टीने खूप काही शिकवण दिली ती म्हणजे धोरण निर्मिती फक्त महत्वाची नसून त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा तितकी सक्षम असली पाहिजे, आणि ती असेल तरच या गरीब आणि गरजू लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल. आणि आज जश्या त्या मुलीच्या चेहऱ्यावर आनंद उमटला तसा आनंद बाकी सगळीकडे सुद्धा निश्चितच परावर्तित होईल हे मात्र नक्की.

(सामाजिक क्षेत्रात काम करत असताना इतर सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्या क्षेत्रीयकार्यात आलेले अनुभव लेखकाने प्रतिलिपीत केले आहेत.) 

Image Source: http://prahaar.in/


Friday, 30 August 2019

ओझ जाणिवांचं...?


 लेखक – प्रवीण पारसे



मागील काही दिवसात सांगली कोल्हापूर मध्ये आलेला जलप्रलय सर्वांनाच परिचित असावा. मागील कित्येक वर्षे सांगली जिल्हा ‘अखंड वाहते कृष्णामाई’ असे अभिमानाने म्हणायचा पण आता कृष्णामाईचं नाव देखील घ्यायची धास्ती वाटते ती या जलप्रलयामुळे. सांगली जिल्ह्यातील एकीकडे जत, आटपाडी, कवठे महांकाळ या तालुक्यातील कोरडा दुष्काळ व दुसरीकडे आलेला हा जलप्रलय. अनिश्चित, अतिप्रलयकारी, साधनसंपत्ती बरोबर माणसाची मनेही ढासळवून टाकणारा हा महापूर सांगलीकरांनी अनुभवला. घरे संसार, जनावरे उघड्यावर पडले, कित्येक उद्योगधंदे, शेतीपूरक व्यवसाय, कुटीरउद्योग, रस्ते, वाहतूक यंत्रणा इत्यादींचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हे आपण सर्वांनी पहिलेच, हे नुकसान लवकर न भरून येणारे आहे.
            महापुराचे संकट आल्यावर सुरवातीच्या दिवसापासून मी व माझे मित्र मदतीच्या कार्यात व्यस्त होतो. वैयक्तिक तसेच संस्था स्थरावर जशी जमेल तशी मदत करत राहिलो या मदतीच्या अनुशंगाने पूरपरिस्थिती व त्यामुळे होणारे नुकसान किती भयावह आहे याची जाण झाली. पूरग्रस्त लोकांच्या पुनर्वसनाच्या शिबिरामध्ये गेलो असता पहिल्या दोन दिवसामध्ये पाहिलेली परिस्थिती अत्यंत विदारक होती. अंगावर पांघरायला पांघरून नाहीत, पावसाने आणि पुराच्या पाण्याने भिजलेले कपडे बदलायला दुसरे कपडे नाहीत. लोकांच्या मदतीच्या हातातून  आलेले जेवण सुद्धा तोंडात घालवत नाही, डोळ्यातून फक्त अश्रूंच्या अखंड धारा आणि पुर कधी ओसरतोय, काय बातमी येते याकडे कान अशी स्थिती पहिल्या काही दिवसात पहावयास मिळाली. यामध्ये NDRF टीम, आर्मी व स्थानिक लोकांच्या सहकार्यातून हजारो लोकांचे प्राण वाचवण्यात आले. माझ्यासोबत मिरजेतील माझे सहकारी, मित्र, परिचित लोक आणि स्थानिक संस्था यांच्या मोलाच्या सहकार्याने मला जमेल तशी मी मदत करत राहिलो. प्रामुख्याने सोशल मिडीयाचा वापर करून पुणे, बेंगलोर येथून सुद्धा माझ्या मित्रांनी आर्थिक मदत पाठवली. स्थिती इतकी भयानक होती की पहिल्या चार ते पाच दिवसात बाहेरून येणारी मदत काहीच नव्हती फक्त स्थानिकांच्या सहकार्याने हे शक्य झाले. सांगली मधील मुख्य बाजारपेठ पाण्यात गेल्यावर जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा ठप्प झाले. मदत करणाऱ्या लोकांनी अक्षरशा मिरज व आसपासच्या गावातील सर्व दुकाने फिरून जमेल तसे साहित्या गोळा केले व गरजू लोकांच्या शिबिरापर्यत पोचवले.
दुसऱ्या आठवड्यात सोशल मिडीयाच्या मार्फत पुरपरिस्थितीची दृश्ये, चित्रफिती प्रसारित झाल्याने आजूबाजूच्या जिल्ह्यातून मदतीचा ओघ वाढला तो इतका होता की त्यामध्ये पुन्हा भ्रष्टाचार, राजकारण याचा शिरकाव झाला. काही लोकांनी तर बाहेरगावातून (तालुक्यातून/जिल्ह्यातून) येणारी मदत गावाच्या बाहेरच अडवून संस्था, गट, मंडळे यांच्या नावावर लंपास देखील केल्याचे पहावयास मिळाले. प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. नेहमीप्रमाणे वरातीमागून घोडे या संकल्पनेस आपले प्रशासन सार्थ ठरले. 
सांगली जिल्ह्यासाठी वरदान ठरलेली कृष्णामाई का विकोपाला गेली यावर मात्र तज्ञ लोकांच्या चर्चा, आरोप-प्रत्यारोपाला वेगळेच वळण मिळाल्याचे चित्र दिसत होते कधीही समाजकार्यात न दिसणारी नेतेमंडळी देखील आज जागी झाली होती, या महापुराने त्यांच्या कठोर हृदयाला समाजासेवेचा पान्हा फुटला हे विशेष. मागील काही दिवसात खूप काही अनुभव आले. दानशूर व्यक्तीचा दानशूरपणा देखील पहावयास  मिळाला तर काही ठिकाणी मदत करण्याची उदासीनता देखील दिसून आली.  पूर ओसरल्यावर शाळा कॉलेजच्या मार्फत होणारी साफसफाई देखील पहिली तर काही ठिकाणी हातात झाडू घेऊन केलेला दिखऊपणा पण देखील लपून राहिला नाही. एकंदरीत या पुरातून शिकण्यासारखे खूप काही मिळाले. माणसाची माणसाबद्दलची आस, प्रेम, संवेदना, येथे जाग्या झालेल्या दिसल्या. धर्म जातीचे बंध नष्ट करण्यास काही प्रमाणात हा पूर यशस्वी झाल्याचे वाटले काही ठिकाणी धर्मांद लोकांच्या मदतीचे हेवेदावे देखील पाहण्यास मिळाले.
सांगली आणि कोल्हापूर मध्ये थैमान घालून हा महापूर आपल्या मार्गे निघून गेला आणि जाताना जगण्याची नवी उम्मेद आणि आस माणसाला देऊन गेला. सध्या फक्त वरील गोष्टीचं चिंतन-मनन करून उपयोग नाही तर गरज आहे निस्वार्थ भाव जपण्याची मग ती माणुसकीविषयी असो वा निसर्गाविषयी.   

Sunday, 16 June 2019

करिअर निवडताना...


                                                                                                                                                    लेखक – प्रवीण पारसे
                        


                            आज सकाळपासून ऑफिसच्या कामात गर्क होतो तेवढ्यात माझा फोन वाजला एका मित्राने नुकतेच १२ वी पास केले होते आणि त्याला BA च्या प्रवेशप्रक्रियेतील विषय निवडीबद्दल माझ्याकडून मार्गदर्शन हवे होते, त्याअंती एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ती म्हणजे करिअरच्या वाटा निवडताना विध्यार्थ्यामध्ये असणारा संभ्रम. हा सावळा गोंधळ सावरण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस उपयोगी पडेल या अपेक्षेनं साकारलेला हा लेखप्रपंच.
                        सध्या मे महिना उलटून गेला आणि जूनही मध्यात आला आहे आणि हा काळ निसर्गाच्या मान्सूनच्या अल्ल्हाददायी आगमनाबरोबरच विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सुद्धा महत्वाच्या काळापैकी एक असे आवर्जून म्हणावे लागेल, त्याचे कारणही तसेच कारण या कालावधीमध्ये विद्यार्थ्याच्या आयुष्यातील करिअरची दिशा आणि दशा याच कालावधीत निश्चित होत असते. सध्या १० वी, १२ वी, नीट, जेईई यासोबतच इतर बऱ्याच परीक्षेंचे निकाल जाहीर झाले आहेत त्यामुळे सध्या सगळीकडेच पुढील शिक्षणासाठीची अडमिशनस् ची धावपळ सर्वत्र दिसून येत आहे. १० वी झालेल्या बऱ्याच विध्यार्थ्याच्या मध्ये खूप सारे गैरसमज आढळून येतात त्यापैकी काही म्हणजे ९०% पेक्षा जास्त गुण मिळाले तर विज्ञान शाखेत प्रवेश त्यापेक्षा कमी गुण मिळाले तर वाणिज्य आणि मग कला असा पसंतीक्रम १० वी च्या मार्कांवर ठरवला जातो मुळात असा पसंतीक्रम ठरवण्यापेक्षा आपला पाल्य भविष्यात काय करू इच्छितो यांचे अध्ययन जर पालकांनी केले तर निश्चितच पाल्याच्या आवडीच्या विषयात त्याला करिअर करता येऊ शकते भले त्याचे दहावीचे मार्क कितीही असोत. उच्च माध्यमिक शिक्षणाच्या निवडीत नेहमी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली  पाहिजे ती म्हणजे विद्यार्थ्याच्या आवडी निवडी काय आहेत त्या जाणून त्या संबंधित सर्व शिक्षण शाखांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यास दिली गेली पाहिजे अर्थातच त्यामध्ये असणाऱ्या काठीण्य पातळीविषयी सुद्धा विद्यार्थ्यास अवगत केले पाहिजे.
                        करिअरचे मार्ग निवडताना फक्त अभियांत्रिकी, वैद्यकीय, वकिली इत्यादीचा विचार न करता व्यावसयभिमुख  शिक्षणावर सुद्धा आवर्जून लक्ष केंद्रित केले पाहिजे. काही अभ्यासक्रम हे कमी कालावधीचे असून ते व्यावसायिक दृष्टिकोनातील असल्यामुळे नोकरीची हमी मिळवून देऊ शकतात. फाईन आर्ट्स, पेंटिंग, मूर्तीकला इत्यादीसारख्या विषयात सुद्धा आपल्या आवडीनुसार करिअरची निवड करता येऊ शकते. पारंपारिक वाटा सोडून कृषी अभ्यासक्रम, समाजकार्य क्षेत्र, स्पर्धा परीक्षा तसेच सध्या भारताच्या विकासाच्या अवस्थेत उपयोगी पडणारे तंत्रज्ञान याचा अभ्यास यासारख्या विविध गोष्टींचा आपण अगत्याने विचार केला पाहिजे.
                        Passion to Profession या इंग्रजी उक्तीप्रमाणे करिअरच्या वाट निवडताना आपण अगदी चोखंदळ राहील पाहिजे. बाजारातून भाजी आणताना सुध्दा आपण त्याची योग्य पारख केल्याशिवाय खरेदी करत नाही मग करिअरचा विचार करताना दुसऱ्याने केले म्हणून आपण ते का करायचे हा माझा सवाल ? लोक काय म्हणतील या भावनेला त्याच क्षणी नष्ट करता आले पाहिजे. लोक काय म्हणतील याहीपेक्षा आपले भविष्य या करिअर म्हधून कसे घडेल यातून आपला चरितार्थ कसा चालेल, आपण केलल्या कामाचे आपल्याला समाधान मिळेल का नाही या गोष्टीचा सातत्याने विचार केला गेला पाहिजे आणि त्यातूनच आपल्या करिअर ची निवड केली आहे.


गोळाबेरीज.........

                                                            लेखक – प्रविण पारसे                                          आज सकाळी स...