शब्दांकन –
प्रवीण पारसे
हिवाळ्याचा
महिना असून सुद्धा रोज बोचणारी थंडी आज तितकीशी जाणवत नव्हती. सकाळी लवकर आटपून आज
कामाच्या ओढीने वळलेली पावले थोड्याश्या आळसातून आल्यासारखी वाटत होती. अंगातला
आळस झटकून जबाबदारीची जाणीव मनात होऊन मनात आलेल्या सुट्टीच्या इच्छेवर भला मोठा
दगड ठेऊन आज महिलांच्या नवीन वसाहतीकडे नुकतेच पाय वळले. जवळचाच पण कधीच प्रसन्न न
वाटणारा तो रोजचा बसचा प्रवास आज ही काही चुकला नव्हता. काही वेळातच ठरलेल्या
उद्दीष्टाच्या दिशेने पाय वळले व ते येऊन ठेपले एका कचरा वेचक महिलांच्या राहत्या
भागाजवळ. ऊन, वारा, पाऊस सतत अखंडपणे झेलणारी ती झोपडी त्या झोपडपट्टीत आजही त्याच
डौलाने उभी होती. गोष्टीतल्या राजाराणीच्या आटपाट नगरीतल्या खळखळणाऱ्या झऱ्यासारखाच
महानगरपालिकेचा सांडपाण्याचा नाला खळखळून निर्भीडपणे झोपडीच्या बाजूने वाट काढून
वाहत होता. घराला घरे चिकटलेली, काही झोपड्या पत्र्याचा आधार असलेल्या तर काही फक्त
लाकडी काठ्याच्या आधारवर असलेल्या प्लास्टिकच्या कागदावर तर काही पोत्याच्या
शिवलेल्या जुनाट झालेल्या ताडपत्रीवरउभ्या होत्या. साधारण दुपारी १ नंतरची वेळ
सूर्यदेव डोक्यावर येऊन सलामी देत होते, या गुलाबी थंडीत सुद्धा ऊन्हाचे अस्तित्व
स्पष्ट जाणवत होते.
या झोपड्या व त्याला लागून असलेल्या
टोलेजंग इमारती यामधील रस्ता म्हणजे समाजातील भेदभाव व आर्थिक विषमता दर्शवणारी
जणू रेषच होती. त्या एका झोपडीत वाकून शरीर सांभाळून प्रवेश केल्यावर आतील भयावह
स्थितीची जाणीव झाली. झोपडीत मांडलेली चूल व त्यावर काळी झालेली जुनाट दोन पातेली
व एक वर्षानुवर्षे चालत आलेला लोखंडी तवा. वळचणीला टाकलेली कपडे, गोधड्या काही
मनातून हटत नव्हत्या. उंदीर, पालीच्या भक्ष्यापासून वाचलेल्या शिक्क्यावरून धुराने
काळवंडलेल्या एका बांबूच्या बुट्टीत ठेवलेले भाकरीचे शिळे तुकडे वगळता तिथे खायचे
सौदर्य काही दिसून आले नाही. काही वेळ उलटून गेल्यावर कामास सुरुवात केली व नवीन
गट, त्यांचे फायदे, बचतीच्या सवयी आणि त्यातून मिळनारे आर्थिक लाभ सांगत असताना
कधी दुपार झाली कळलीच नाही. तेवढ्यात दारात मुलींचा गलका आला आणि त्यातून दोन
चुणचुणीत मुली सफाईदारपणे आत शिरल्या. शाळेचा ठीक ठिकाणी उसवलेला गणवेश,
गणवेशावरील मळकट आणि जुनाट झालेला शाळेचा बिल्ला, चापून घातलेल्या दोन वेण्या आणि
त्यावरील लाल रिबीन शाळेच्या अस्तित्वाची साक्ष देत होत्या. आल्या आल्या त्या
मुलीनी आपल्या आईकडे आणि एकंदरीत वातावरणाकडे नजर टाकली आणि भाकरीच्या बुट्टीकडे त्यांचे पाय वळले आणि
आणि त्यांनी त्यातील वाळल्या भाकरी घेऊन खाण्यास सुरुवात केली. नियमित सवय
असल्यामुळे बिनधास्त त्यांनी त्याचा खाण्याचा कार्यक्रम चालू ठेवला. पण हे दृश्य
काही डोळ्याने बघवत नव्हते आणि नकळतच तेथे
आलेल्या व्यावसाईक समाजकार्यकर्त्यांनी आपला डबा काढून त्यांच्या समोर ठेवला पण
त्या मुलीनी तो घेण्यास नकार दिला पण थोडासा हट्ट आणि प्रेमाने बोलल्यावर त्यांनी
तो डबा आनंदाने आणि आपुलकीने स्वीकारला आणि त्या डब्यात असणारी चपाती-भाजी खाताना
पुरणपोळी खाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. अश्या आनंदाच्या पलीकडे
आयुष्यातील इतर गोष्टीचा आनंद फिका पडतो हे मात्र निश्चित. जेवण झाल्यावर दिलेल्या
चोकलेटने त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद अगदी काळजात साठवून ठेवण्यासारखा होता
हे मात्र निश्चित. बचत गटाच्या कामाचं औचित्य साधून या वसाहतीला झालेली भेट मनाला खूप
काही शिकवून जात होती. शासनाची धोरणे भलेही खूप चांगली आणि गरिबांसाठी असोत पण
त्यांना राबवणारी यंत्रणा हि अजून सुद्धा तळागाळापर्यंत पोहचू शकली नाही याची खूप
खंत वाटते. आज झालेल्या या गोष्टीने खूप काही शिकवण दिली ती म्हणजे धोरण निर्मिती
फक्त महत्वाची नसून त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा तितकी सक्षम असली पाहिजे,
आणि ती असेल तरच या गरीब आणि गरजू लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल. आणि आज
जश्या त्या मुलीच्या चेहऱ्यावर आनंद उमटला तसा आनंद बाकी सगळीकडे सुद्धा निश्चितच
परावर्तित होईल हे मात्र नक्की.
(सामाजिक
क्षेत्रात काम करत असताना इतर सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्या क्षेत्रीयकार्यात
आलेले अनुभव लेखकाने प्रतिलिपीत केले आहेत.)
![]() |
Image Source: http://prahaar.in/ |